स्वच्छता श्रमदान मोहिमेतून “स्वच्छता ही सेवा “अभियानाचा जिल्हयात शुभारंभ

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2021या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविणेत येत आहे. या अभियानांतर्गत आज जिल्हयातील सर्व गावांमध्ये श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

       या अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरोली (पुलाची), ता. हातकणंगले येथे मा. खासदार श्री. धैर्यशील माने यांनी स्वच्छता श्रमदान व शोषखड्डा बांधकाम शुभारंभ केला. तर ग्रामपंचायत सडोली (खालसा), ता. करवीर येथे मा. श्री. राहूल पाटील, अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर व मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांनी स्वच्छता श्रमदानाचे माध्यमातून अभियानाचा शुभारंभ केला. ग्रामपंचायत मसोली, ता. आजरा येथे मा. श्री. जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष, जि.प. कोल्हापूर यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
       या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता श्रमदान करून   स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत  स्वच्छता फेरी व सायकल रॅलीचे आयोजन करून स्वच्छतेचे संदेश देण्यात आले.  गावामध्ये स्वच्छता घोषवाक्य रंगविणे स्पर्धेअंतर्गत गावामध्ये स्वच्छतेचे संदेश रंगविणेत आले. तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी गावस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनासाठी  शोषखड्डे बांधकाम शुभारंभ व प्लास्टीक संकलन  असे विविध स्वच्छता विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यासोबत पदाधिकारी व अधिकारी यांनी गावातील स्वच्छतेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.  या अभियानातील विविध स्वच्छता उपक्रमांमुळे जिल्हयातील जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF +)  होणेसाठी मदत होणार आहे.
       या उपक्रमामध्ये मा. जिल्हा परिषद सदस्य, मा. सभापती, पंचायत समिती व सदस्य, पंचायत समिती, गटविकास अधिकारी सर्व, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, तरुण मंडळे, महिला मंडळे, बचत गट व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. या अभियानाचे सनियंत्रण मा. श्री. राहूल पाटील, अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली  करणेत येत आहे.