इस्पुर्ली येथे कॅन्सर निदान शिबीर संपन्न

महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री नाम.चंद्रकांत दादा पाटील आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सोै.शौमिका महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार व जिल्हा आरोग्य अधिकारी सौ.उषादेवी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत करवीर तालुक्यामध्ये कॅन्सर निदान व चिकित्सा शिबीरांचे आयोजन करणेत आल्यानुसार जिल्हा परिषद कोल्हापूर व ॲपल सरस्वती हॉस्पीटल यांच्या विद्यमाने इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कॅन्सर शिबीर नुकतेच संपन्न झाले.

या शिबीराचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सौ.संध्याराणी बेडगे (दिंडनेर्ली) यांच्या शुभहस्ते व पं.स.सदस्य श्री.रमेश चौगले (नंदगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षानी जि.प.सदस्या सौ.शिल्पा पाटील (हसुर दुाा.) होत्या. प्रास्ताविकात तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.डॉ.जी.डी.नलवडे यांनी करवीर तालुक्यातील 425 आशा स्वयंसेविकांच्या मार्फत फेब्रुवारी मध्ये घरोघरी भेटी देवून कॅन्सर विषयक सर्व्हेक्षणात 2710 संशयित रुग्ण आढळले असून यासर्वच रुग्णांची वैद्यकीय अधिका-यामार्फत प्राथमिक तपासणीनंतर तालुक्यात आयोजित करण्यात येत असलेल्या कॅन्सर निदान चिकित्सासाठी आयोजित 6 शिबीरातून तपासणी करणेत येणार आहे. आजपर्यत झालेल्या एकूण 3 शिबीरातंर्गत कॅन्सर विषयक विविध चाचण्या व तपासण्या करण्यायोग्य 87 रुग्णांची यादी करणेत आली असून या व उर्वरीत शिबीरातून अशा प्रकारच्या आढळणा-या रुग्णांची तपासणी व चाचणी ॲपल सरस्वती हॉस्पीटल आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्याकडे करणेत येऊन कॅन्सर उपचार कराव्या लागणा-या रुग्णांना 15000 पर्यत अनुदान देण्यात येणार असलेचे विषद केले.

ॲपल सरस्वती हॉस्पीटलचे कॅन्सर तज्ञ डॉ.निखील गुळवणी यांनी सद्याच्या युगात खाण्या-पिण्याच्या बदल्या सवयी,युवक आणि तरुणांमधील तंबाखु,मावा,गुटखा यांसारख्या व्यसनांचे वाढते प्रमाण,महिलांमधील आरोग्याच्या समस्यांमधील संकोचितपणा व होणारे दुर्लक्ष,सोशिकता तसेच त्यांच्यामधील वाढते मिसरीचे व्यसन प्रमाण तसेच रासायनिक खते आणि किटक नाशकांचा अतिरिक्त वापर यामुळे 1995 सालाच्या प्रमाणात कॅन्सरचे प्रमाण 200 पटीने वाढले असून यासाठी सर्वानींच एकत्र लढा देणे गरजेचे असून यासाठी जिल्हा नियोजन मंडळ आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी उचललेले पाऊल निश्चितच उपक्रमशिल आणि नाविन्यपूर्ण असून कॅन्सर रुग्णांना दिलासादायक असल्याचे नमूद केले.

या आरोग्य शिबीरात 263 रुग्णांनी नोंदणीद्वारे तपासणी करुन घेतली. कार्यक्रमास ॲपल सरस्वती हॉस्पीटलच्या व्यवस्थापक श्रीम.गीता आवटी व डॉ.पुष्कर कुलकर्णी,ग्राम पंचायत नागाव सरपंच सौ.नाईक,परिते सरपंच श्रीम.कारंडे,इस्पुर्ली उपसरपंच श्री.प्रदिप शेटे व दिंडनेर्ली उपसरपंच सौ.सुप्रिया पाटील,रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ.अनिल पाटील,इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सौ.खराडे- पाटील,विस्तार अधिकारी श्री.प्रदिप अष्टेकर,श्री.सुनिल जाधव तसेच इस्पुर्ली प्रा.आ.केंद्राकडील सर्व कर्मचारी वर्ग,आशा स्वयंसेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक श्री.राहुल शेळके यांनी केले व आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.शोभा भोई यांनी मानले.

डॉ.जी.डी.नलवडे

तालुका आरोग्य अधिकारी

पंचायत समिती करवीर